पुणे : सर्व पात्र कुटुंबांना शिधापत्रिका, सर्व पात्र शिधापत्रिकांना धान्य वाटप आणि सर्व कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्ह्यात नुकताच पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमिता तळेकर व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी अनघा गद्रे उपस्थित होत्या.
पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियाना अंतर्गत १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेद्वारे पुणे जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण कुटुंबांना शंभर टक्के गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेविषयी भानुदास गायकवाड यांनी माहिती दिली,तर अनघा गद्रे यांनी या योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.
या अभियानादरम्यान अन्न सुरक्षा योजनेतील पात्र कुटुंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार असून, त्याव्दारे निवड करण्यात आलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना शंभर टक्के धान्य वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले.
पुणे जिल्हयात सद्यस्थितीत एकूण एक लाख ४२ हजार ६४९ गॅस जोडण्या देण्यात आल्या असून, ७३ हजार ८९९ लाभार्थ्यांना केरोसीन वाटप करण्यात येत आहे. तालुका स्तरावरून ७३ हजार ८९९ लाभार्थ्यांना संबंधित गॅस वितरकांकडून गॅसजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी व पुणे जिल्हयातील सर्व गॅस वितरक यांना करण्यात आल्या.
या वेळी जिल्हयातील सर्व गॅस वितरक, तसेच सर्व तहसिल कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.